Saturday, July 24, 2010

आजी

'डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका. हे गाणं सगळ्यात आधी आजीकडून ऐकलं. अनेक भावगीतं तिला तोंडपाठ होती. वयाच्या ८० व्या वर्षी तिच्या ह्या स्मरणशक्तीचं मला आश्चर्य वाटे. मला आजी आठवते ती ह्या अलीकडल्या १० वर्षातलीच. त्याआधी म्हणजे आजोबा असताना बहुधा कुठल्यातरी कामात गुंतलेली. बोलायचं , गप्पा मारायच्या त्या आजोबांशीच. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे ह्या मे मधे तिला जाऊन ४ वर्षं होतील. पण अजूनही अनेकदा गप्पांमधून , किंवा आईकडून उपदेशाचे डोस मिळताना तिची आठवण येत राहते. आमची आई म्हणायची ......... अशी कित्येक वाक्य नकळत आजीला घेऊन येतात. तिची ती छोटीशी मूर्ती, बोळकं तोंड, अखंड बडबड, नऊवारी साडी आठवते.

प्रत्येकाला वाटतो तसा आजीबद्दल मायेचा कोपरा माझ्याही मनात आहे. पण त्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून जेव्हा मी तिचा विचार करते तेव्हा एक आदराची आणि अभिमानाची भावना मनात येते. त्या काळातल्या रीतीनुसार मराठी चौथीपर्यंत शिकली आणि लग्न झालं. योगायोगाची गोष्ट म्हणजे ती नवीन मराठी शाळेत शिकली (माझ्या आठवणीप्रमाणे) आईसुद्धा आणि मी सुद्धा. उगाच अशी नाळ जुळल्यासारखं वाटतं. आजोबा शिस्तीचे, घरात पाहुणे, ९-१० बाळंतपणं, तितकीच लग्नं, बारशी, केळवणं, डोहाळजेवणं......सणवार. सगळं रीतीने निभावणारी. आजोबा हुशार होतेच पण आजीमधेदेखील एक चमक होती. ह्या सगळ्या पसाऱ्यात कुठेतरी हरवून गेलेली. पूर्ण गीतरामायण तिला पाठ होतं. अनेक ओव्या , कुठलीकुठली गाणी म्हणत असायची. आता वाटतं लिहून ठेवायला हवी होती. बारसं, डोहाळजेवण, याची पारंपारिक गाणी आता काळाच्या ओघात त्या पिढीबरोबर लोप पावत चालली आहेत.

एवढ्या सगळ्या राबत्यात माणसाची उर्मी हरवून जाते...पण तिने ती जपली. मला आठवतं मला नऊवारी साडी इतक्या हौशीने शिकवली होती. अजूनही तिच्या दोन साड्या माझ्याकडे आहेत .... नेसायला म्हणून आणलेल्या. तिची एक बॅग होती. जरा वेळ काढून गेलं की एकदा सगळी उजळणी असायची. ही ना काशीकडल्या लग्नात आली. ही मला किरणच्या लग्नात घेतली........असं प्रत्येक साडीचं stock taking झालं की मगच बॅग बंद. आम्ही आपल्या तिची चेष्टा करायचो. किती सांभाळून ठेवशील. नेसायला काढ सगळ्या. पण तिचा जीव गुंतला होता त्यात. एवढ्या नेसल्या जायच्या नाहीत..... मग उजळणीत आनंद.

तिचं ते गोदरेजचं कपाट म्हणजे अलिबाबाची गुहा होती. बिस्कीटाच्या तुकड्यापासून..... सोन्यापर्यंत सगळं असायचं. भेटायला आलेलं माणूस काहीतरी घेऊन यायचं. हिचं खाणं कमी आणि वाटावाटीच जास्त. राणीने आणलेलं विजूला, विजूचं वनाला... असं चालू असायचं. मी गेले की तिला म्हणायचे चला उघडा तुमचा खजिना, आणि करा रिकामा. देण्यासाठी कधीही हात आखडता घेतला नाही. आजोबा असताना त्यांनी सगळं ठरवलं असेल पण त्यांच्या पश्चात तिने मनमोकळेपणाने सगळ्यांना आहेर केला.

मला सगळ्या कौतुक कशाचं वाटतं तर आजोबा गेल्यानंतरही ती आनंदाने जगली. दुखतय खुपतय सगळ्या कुरबुरी सांगत औषधं घेत जगली. कुठल्या गोष्टीसाठी रडत नाही बसली. आज कित्येक आज्या आहे आयुष्य म्हणून काढायचं असं करत जगताना आपण पाहतो. पण ह्या सगळ्याचा लवलेषही तिच्यामधे कधी दिसला नाही. कुठेही यायला, जायला, राहायला तयार. सणासुदीला, लग्नमुंजीला नवी साडी नेसून तयार. तिला जे जमेल ते खायची, प्यायची. नको नाही म्हणत कधी कशाला आडकाठी नाही केली. हॉटेलमधे गेलो तरी विचारून काय खाता येईल तेवढं खायची. लिप्टी२ घे (Live52) म्हणजे पचन सुधारेल मला सांगायची.

चश्मा असल्याने छोटं अक्षर दिसायचं नाही. पण सकाळमधल्या सगळ्या हेडलाईन्स वाचायची. कधी आपण बोलत असताना काही संदर्भ आला तर तिला त्याची इत्यंभूत माहीती असायची. एक टेपरेकॉर्डर होता तिच्याकडे. तिला नाही जमायचं कॅसेट लावायला पण आम्हा नातवंडांना सांगायची. गीतरामायणाचा सगळा संच होता तिच्याकडे.

वेगळा टीव्ही पाहिजे म्हणून टीव्ही घेतला होता. केबल होतं. क्रिकेटची मॅच अगदी आवडीने बघायची.

दादामामाकडे जायचं ठरलं तर अगदी उत्साहात तयार होती. कदाचित कधी पुण्याबाहेरही एकट्याने गेली नसेल. एकही इंग्रजी वाक्य येत नसताना , वयाच्या ८० व्या वर्षी एकटीने अमेरिकेला जायची तयारी दाखवणाऱ्या तिच्या खंबीर मनाचं मला कौतुक वाटतं. मला आठवतं आम्ही सगळे तिला कामापुरतं इंग्रजी शिकवत होतं. आणि तिच्यापुरतं ती शिकलीही होती. केवळ मुलाला भेटायच्या दुर्दम्य उत्साहावर ती निघाली होती. पण दुर्दैवाने तिला व्हिसा मिळाला नाही. पण मिळाला असता तर ती नक्की जाऊन आली असती ह्याची खात्री आहे.

अगदी शेवटी तिला जेव्हा दवाखान्यात भेटायला गेले.... तेव्हाही मला खुणेनं विचारलं एकटीच आलीस? प्रविण कुठय? म्हंटलं आलाय. तेव्हा त्याला शोधलं हात केला. तिला म्हंटल लवकर बरी हो. आणि घरी ये. हो म्हणाली. बाहेर आले तोपर्यंत मला अंदाज नव्हता. बाहेर आल्यावर आईच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि काळजात चर्र झालं. २ दिवस फ़क्त काढले दवाखान्यात. कायम म्हणायची अशी हिंडती फ़िरती आहे तोवर ने मला. लोळागोळा होऊन नको पडायला. देवाने खरच ऐकलं तिचं.

आज आपण mental piece, personality development च्या गोष्टी करतो. हसत खेळत, सुखासमाधानाने जगणाऱ्या माझ्या आजीची personality मला बरंच काही शिकवून गेली. शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची उर्मी ठेऊन, प्रत्येकाच्या आयुष्यात एक आनंदाचं रोप लावून, भाजणीच्या थालीपीठाचा खमंग स्वाद आमच्या मनात ठेऊन ती निघून गेली. तिनेही अनेक दु:ख बघितली, अनेक जवळच्या लोकांचं मरण बघितलं. पण ह्या साऱ्यातून मार्ग काढत, चेहऱ्यावर अढी किंवा आठी न ठेवता अत्यंत प्रसन्न मनाने जगली. तिच्या समृद्ध जगण्यातले कण आपल्याही वाट्याला आले. त्या कणांची जाण ठेऊन आपणही समृद्ध जगूया.

दीपा.

डोहाळजेवण

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो. सगळ्यांना हवीहवीशी गोड बातमी कानावर येते. सगळ्यांच्या मनात आनंद उत्साह. तिच्याही मनात असतो अपार आनंद. पण त्याबरोबर असते एका कोपऱ्यात कुठेतरी एक अनामिक भीती, थोडं जवाबदारीचं ओझं. पण सगळ्यात सुखद वाटतं ते एकच..."मी आई होणार"

"आई".... अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केले आहेच. पण मला वाटतं "आकलनापलीकडचं ईमान" म्हणजे आई. बाळाशी जी नाळ जोडली जाते ती कायमचीच. बाळ जन्माला आल्यानंतर ती physically कापली तरी वात्सल्याच्या रुपात किंवा काळजीच्या रुपात आई कायम जोडलेलीच राह्ते.

आता हे आईपण येतं कुठून? अत्यंत चंचल, हळवी, असमजूतदार मुलीचं अचानक वास्तल्यमूर्तीत रुपांतर होतं कसं? बाळ पोटात असल्यापासून जपण्याचे संस्कार रुजत जातात. दिसामासांनी जसं ते आकार घेत असतं तसंच तिच्याही नकळत तिच्यातलं आईपण जन्माला येत असतं.

डॉक्टर, सोनोग्राफ़ी, iron, folic, गर्भसंस्कार, व्यायाम सगळं काही सुरु होतं. बाळगुटी, शेक , खाणंपिणं यावर सगळ्यांचे सल्लेही सुरु होतात. How to develop your baby's intelligence? असे क्लासही सुरु होतात. पण ह्या सगळ्यात आई कसं व्हायचं हे कुणीच शिकवत नाही. आता तुम्ही म्हणाल त्यात शिकवायचं काय?. .... पूर्वीची गोष्ट वेगळी होती. मुलात मूल वाढत होत. जेवत होतं शिकत होतं. पण सध्याच्या जमान्यात सगळं काही Best देण्याच्या मागे फ़िरताना होणारी दमछाक वेगळी आहे. अनेक भावंडांवरुन एकुलत्या एक अशा उरलेल्या पिढीवर अपेक्षांचा डोंगरही तेवढाच मोठा आहे. Cut Throat competition आणि Reality shows च्या गराड्यात बालपण हरवतय. आई होणं म्हणजे ह्या सगळ्याचं जाणतं भान असणं. झापडं लावून पळण्याऐवजी का? हा प्रश्न पडणं गरजेचं आहे. Ready, Instant, immediate असं सगळं हवं असताना मूल वाढवताना लागणारा Patience शिकवणं गरजेचं आहे. मुबलक पैसा आणि सुबत्ता असली तरी ’नाही" म्हणण्याचा अधिकार शिकवणं गरजेचं आहे.

बाळासाठी जीव तुटत असताना स्वत:च्या करियरची होणारी ओढाताण, शाळांचे प्रवेश, अवास्तव मागण्या, मुलांचे हट्ट, सगळीकडे सगळं पुरवताना "आई" ची होणारी ससेहोलपट खरंच अवघड आहे.

ह्या सातव्या महिन्याच्या उंबरठ्यावर डोहाळजेवणाच्या निमित्ताने हे सगळं बोलावसं वाटलं. फ़ुलांनी सजवताना, झोपाळ्यावर झुलवताना प्रार्थना एवढीच की तुझी चित्तवॄत्ती आनंदी राहू दे. दोह्रुद असलेल्या तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. सगळं काही सुखरूप होईलच. आईपण येतंच ते सजगपणे निभावण्यासाठी हा सारा अट्टाहास. नऊ महिने होणारे सगळे कष्ट त्या इवल्याशा जिवाच्या दर्शनाने शमतात आणि मनातल्या सगळ्या प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळतात.



सुखावलेल्या धरतीत जेव्हा अंकूर रुजतो
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

स्वप्नं फ़ुलतात,
डोहाळे लागतात,
इवलीशी पावले चाहूल देतात
धडधडत्या काळजाचा नाद सुरु होतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

कसं होईल? काय होईल?
अगणित प्रश्नांची घाई
कळा देताना खूप खूप
दुखतं का गं आई ?
सगळं काही सोसायचं बळ जेव्हा येतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

थोडी चिडचिड होते
थोडी तडफ़ड होते
करियर की बाळ
अशी स्पर्धा सुरु होते
इवल्याश्या जिवणीचाच मोह जडू लागतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

ते हसणं ते बोलणं
ते रांगणं नि धडपडणं
काळजीच्या काजळीनं
काळजाला गाठणं
सुखाचा अश्रू जेव्हा डोळ्यालगत येतो ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं

पळू नकोस लागतं
हे सांडतं ते भाजतं
जरा थोडं ऐकलं तर
सांग तुझं कात जातं
माझ्यातल्या आईला जेव्हा माझ्या आईचं मन कळतं ...
आई हे नातं खरं तर तेव्हाच सुरु होतं


दीपा कुलकर्णी मिट्टीमनी .

Saturday, April 4, 2009

माझी खोली

माझी खोली म्हंटलं की त्याला एक 'मी'पणाचा स्पर्श आहे। आणि तसा प्रत्येकाचं असतच . किरकोळ वस्तू असोत, कवितांची वही असो, फोनवर बोलताना गिरवलेले कागद असोत. त्यात मी असते विखुरलेली. तरीही एकसंध असं काहीतरी. कदाचित सगळ जगणच माझं अस आहे.


म्हणजे कधी मला विरक्ती घ्या अस सांगितल तर बहुदा सगळ्यातला मोह सोडायला मला दोन-चार वर्षं जातील (कमीच सांगितली का ;)


प्रत्येक वेळी नवा छंद , त्याचा सगळा पसारा, दरवेळी वाटतं हां हे आपलं फ़ायनल एम. पण नवखे चार दिवस टिकतात, परत नवा गडी नवीन राज्य. नाही म्हणायला कविताच बरी टिकली खरी. मी कित्येकदा सोडलय तस तिला पण प्रत्येक वेळेस , दूर सोडलेल्या मांजरासारखी मला शोधत शोधत परत आलीये.
कुठे जन्म होतो तिचा अजूनही मला पत्ता नाही। म्हणजे गल्लीच्या टोकापर्यंत तर तिला पाहिलं होत, एवढ्यात कुठे गेली माहीत नाही अस होतं.


तरी मला आवडतं असं विखुरलेलं , आणि अस्ताव्यस्त आयुष्य जगायला। स्वत:च एकटेपण एंजॉय करायला। माणसं हवीतच आजूबाजूला. पण त्या सार्‍यात माझी एक स्वतंत्र खोली आहे. कदाचित खूप गहिरी, अंतर्मुख, हळवी तितकीच कट्टर. प्रवेश बंद ची पाटी नाहीये दारावर, पण रस्ता इतका अवघड आहे की फ़ार थोडे पोचलेत तिथवर. 'एंजल्स & डेमन्स' मधला लास्ट लेयर समजा. तसा प्रत्येकाचाच असावा थोड्याफ़ार फ़रकाने.


अगदी खूप ओळखीच्या माणसांना तरी आपण किती कमी ओळखतो. अचानक एका दिवशी वाटतं अरे तो असा असेल असं वाटलं नव्हतं. ते वागणं त्या आतल्या खोलीतल्या शेल्फ़वरून चुकुन बाहेर आलेलं असतं.

Monday, December 29, 2008

बदल

"चला बाय. हॅव अ नाईस वीक एन्ड ""बाय, सोमवारी भेटू गं. दोन दिवस नाहीयेस ना ........ एन्जॉय. "

खूप दिवसांत जमलं नव्हतं. ह्या शनिवरी रविवार अगदी वेळ काढून गावी जायचं ठरवलं. आजोबा गेल्यापासून तिथलं घर बंद पडलंय. जी काही थोडीफ़ार शेती होती ती विकायचा धीर होईना. आजोबा होते तो पर्यंत शेवटपर्यंत सगळं बघत होते. इतक्या वर्षानुवर्षं असलेली जमीन थोड्याफ़ार पैशासाठी विकली नाही. एक गडी ठेवलाय तो बघतो सगळं. मी अधूनमधून चक्कर मारून येते. पण एवढ्यात तेही जमलं नव्हतं.

अलार्म वाजला. दूर कुठेतरी काहीतरी वाजतंय एवढीच जणीव झाली. मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. शनिवारी सकाळी पण लवकर उठायचं म्हणजे जीवावर येतं. पण आज कार नव्हती. नेमकी दुरूस्तीला गेली होती. म्हणजे धडपडत जाऊन एस.टी. पकडली पाहिजे.

सुखवस्तू राहायची सवय झाली की छोट्या छोट्या गोष्टीतले कष्टसुद्धा नकोसे वाटू लागतात. इतकी वर्ष कार नव्हती तेव्हा एस. टी. च्या जिवावरच सगळं चाललं होतं. पण आज तोच वास, ती अडाणी गर्दी नको वाटत होती. सगळे विचार झटकून आवरलं. बस पकडली. खिडकीजवळची जागा पकडून बसले.

थोड्या वेळाने एक कळकट धोतरवाला माणूस आला.

"ताई वाईच सरकून घ्या."
मी आखडून बसले, त्याचा स्पर्श होऊ नये असा अशक्य प्रयत्न करत. त्याच्या अंगाला खास गावातल्या शेणाचा वास येत होता. त्याने चंची काढली, सुपारीची खांड कातरून तोंडात टाकली. डोक्याचा फेटा सोडला, त्यालाच हात पुसले. टीश्यू पेपर ची सवय झालेल्या माझ्या शहरी मनाला कसंसंच झालं.

मी दुर्लक्ष करून बाहेर बघू लागले. हवा छान होती. प्रसन्न आणि ताजी. घाट, डोंगर, श्रावणातली ओली हिरवळ पसरलेली. मन गावात जाऊन पोचलं होतं. पण आत आजीची वाट बघणारी नजर नसेल दारात.
"थांब गं पोरी, तुकडा ओवाळून टाकते. मग आत ये."
असं म्हणणारं पण कोणी नसेल. पण अंगणातला पारिजातक असेल, माझ्यासाठी मखमली गालिचा पसरून वाट बघत असेल. दार उघडताना कडी कुरकुरेल. किती दिवसांनी आलीस असं विचारेल.
विचार करता करता कधी गाव आलं कळालंच नाही . वाड्याचं दार उघडलं , कडी कुरकुरली. ओळखीचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं . खूप दिवस बंद राहिल्याचा कोंदट वास भरला होता. सगळी दारं खिडक्या सताड उघडी टाकली . कोण आलंय बघायला उन्हाचे कवडसे डोकावले. वार्‍याने सगळीकडे फ़िरून पाहिलं . आता कसं घर भरल्यासारखं वाटलं. कितीतरी वेळ नुसतीच बसले.

बाहेर ओसरीवर कुणाचीतरी चाहूल वाटली म्हणून बाहेर आले. बघितलं तर शिरपा.

"अरे शिरपा तू होय. ये ये. तुला बरा सुगावा लागतो मी न कळवता आले तरी."

"तसं न्हाई ताई . चावडीवर एक पोरगं भेटलं . त्याने पाह्यलं तुम्हास्नी. त्येच्याकडून कळलं."

"झालं म्हणजे गावभर खबर झाली असणार."

"अवं ताई , शंभर एक उंबर्‍याचं गाव. कुणी शिंकलं तरी कळणार. तर तुमचं येणं लपणार हाये होय ?"

"बरं बरं .. तुला निरोप पाठवणारच होते . मलाही खूप दिवसात यायला जमलं नाही . काय खबरबात. कसं चाललंय सगळं?"
"ठीक हाये. वरच्या रानात पेरणी झालीया. औंदा पाऊस तर चांगला झालाया. इकडच्या तुकड्याचा ऊस तोडणीला आलाय. कारखान्याची दरयेळची बोंब हायेच. बघू पुढच्या आठवड्यात एकदा पाणी फ़िरवून मग लावू तोडणीला. बिगारी बी मिळेनासं झालेत आजकाल. जो तो शहरात पळतोय. तुमी नगा काळजी करू. मी बघतो की सगळं. तुमी आलासा तं आरामात र्‍हावा चार दिस. सदा आपली लगबग. शेवंताला धाडतो सफ़ाईला."

"अरे नको. मी घेईन तेवढं करून. तसंही उद्या संध्याकाळी जायचंय परत"

"गाडी न्हाई दिसली:

"नाही आणली ह्या खेपेला"

"खालच्या मळ्यातली केळी लागली का रे?"
"लागायला लागलीयेत. केळफ़ूल पाठवतो. हाये माझ्या ध्यानात सारं"
मी हसले. शिरपा शेतीचं सारं बघत होता. अगदी मन लावून. कधी पैशाचा हव्यास नाही. फ़सवाफ़सवी नाही. हिशोबाला चोख. मला सगळं जमेना तेव्हा त्याला वाटेकरी करून घेतला. तसंही शेतावर राबणं... राबणं सोडाच नुसती देखरेख करणं हेदेखील मला शक्य नव्हतं. शहरी माणसांचं काम नाही. शिरपा बघायला लागल्यापासून मी निश्चिंत झाले होते. आजोबा असताना तो आमची गुरं सांभाळायचा. नंतर गुरं विकली. त्याची स्वत:ची जमीन नव्हती. पण त्याला शेतीतली माहिती चांगली होती. म्हणून त्याच्यावर सोपवलं.

"बस रे. मी चहा टाकते. मलाही घ्यायचाच आहे. आणि आत येऊन बस. ऊन तापायला लागलंय"

"न्हाई ताई. च्या नगं. आणि मी इथच ठीक हाये."
"आत चल आधी मुकाट्याने."

मी चहा टाकायला आत गेले. आधण ठेवलं. कपबशा काढायला गेले आणि आजीची आठवण झाली.

" खालच्या फ़डताळात गडी माणसांसाठी वेगळ्या कपबशा अहेत. त्यात दे. उगाच लाडावून ठेवू नकोस."
मला हसायला आलं. मी नेहमीच्या वापरातल्याच दोन कपबशा काढल्या. शिरपा आत आलेला दिसला.
"अरे वर बस. खाली नको बसूस."
"न्हाई न्हाई. मी हिथं ठीक हाये."
चहा घेऊन बाहेर आले. एक कप शिरपासमोर धरला.
" ठेवा खाली ताई. मी घितो."
मी कप खाली ठेवला. अशाच गप्पा मारत मारत चहा झाला. शिरपाने चहा घेऊन बाहेरच्या नळावर कप विसळून परत आणून खाली ठेवला.
"ताई पाणी घालून घ्या."
"शिरपा काही गरज आहे का याची? मी तुला कधी असं वागवलय का? शिवू नकोस, घरात येऊ नकोस म्हंटलंय का कधी?"
"तसं न्हाई ताई . तुमी वाईट वाटून घेऊ नका. पण सवयच झालीये. आणि गावातले लोक....."
"हे बघ. मी हे अस्पृश्य वैगेरे काही मानत नाही. आणि गावातले लोक काय विचार करतात याच्याशी मला काही घेणंदेणं नाही."

"ताई तुम्ही शिकल्यासवरल्या. शहरात राहता म्हणून असा विचार करता. पण गाव अजून तसच हाये."
"हो पण किती दिवस. आता बदलायला हवं ना. जग कुठे चाललय?"

"ताई रागावू नका अशा. सवय न्हाई जात. ५-६ वर्षाचा व्हतो तवाधरनं बा बरुबर गुरं राखाया जायचो. बामनाच्या वाड्यावर गेलो की बा सारखा सांगायचा. हिथं बस, आत जाऊ नगंस, कशाला हात लावू नगं . अन त्यादिवशी बामनाची पोर अंगणात खेळत हुती. खेळताना पडली म्हणून उचलायला धावलो. चाबकाचे फ़टके बसले पाठीवर शिवाशिव केली म्हणून. बा जे सांगायचा प्रयत्न करत हुता ते त्यादिवशी रक्तात भिनलं"

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. शिरपा जो बामन म्हणत होता ते कदाचित माझेच आजोबा..... अंगावर काटा आला. माझंच रक्त आता बेइमानी करून उठलं. डोकं सुन्न झालं. काहीच सुचेना.

"जाऊ द्या ताई. तुमी नगा तरास करून घेऊ."
"अरे पण काळ बदलला आता."
"ताई काळ बदलला पण रक्त न्हाई बदललं. जे रक्तातून वाहतं पुसता न्हाई येत ताई."
शिरपाने मला निरुत्तर केलं. मला काय बोलावं सुचेना. मला सकाळची एस.टी. आठवली. अंग चोरून बसलेली मी. .....अंगात वाहणारं रक्त........ चाबकाचे फ़टके........ड़ोळे धूसर झाले. कुठल्याशा प्रेरणेने मी म्हणाले.
" चल तुझं खोपटं दाखव मला. उद्या पिठलं भाकरी खायला येणार आहे."
"ताई पण...."
" चल म्हंटलं ना ...."
रक्त पण बदललंय हे सिद्ध करायचं होतं मला जणू........

दीपा कुलकर्णी -मिट्टीमनी.

Thursday, September 18, 2008

ऍबस्ट्रॅक्ट आर्ट

माझ्या ऑफिसमधे एक चित्र लावलय। कसल आहे ते मी सांगू शकत नाही कारण मलाच अजून ते कळलं नाहीये. दरवेळी तिथून जाता येता जेव्हा जेव्हा मला ते चित्र दिसतं, मी थबकते. कारण काही कळतच नाही नक्की काय काढलय.


त्याच्या शेजारी अशी एक भली मोठी माहिती लिहिली आहे। त्याच्यावरून मला कळलं ह्याच नाव "मॉर्नींग परस्पेक्टीव्ह " अस आहे. आणि ते ऍबस्ट्रॅक्ट आर्ट आहे. त्या चित्रकाराने मोठ्या मोठ्या शब्दात सकाळ्ची किरण, प्रकाश, नवीन सुरूवात अस काहीस लिहिलय.


झालं मग काही दिवस मी निरीक्षण केल, कुठल्यातरी ऍंगलने त्यात सकाळ, उत्साह, किरण असं काही दिसतय का ? पण छे मला तर ते वय वर्ष २ असलेल्या मूलाने रंगीत खडूने मारलेल्या रेघोट्या वाटतात। २ वर्ष म्हणाले कारण त्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलंसुद्धा सुसंबद्ध चित्र काढतात. म्हणजे त्रिकोणी डोंगर, एक घर, नदी, मधून येणारा सूर्य, एक चार आकड्याचा पक्षी, अस काहीतरी. बरं उत्कॄष्ठ रंगसंगती आहे, अगदी नुसत बघायला छान वाटतय असही काही नाही. आणि किंम्मत काही हजार डॉलर्स. म्हंटलं चांगला उद्योग आहे.


परवा माझ्या लेकीने सगळे रंग माझ्या वहीवर सांडले, ते जे चित्र तयार झालं ते पण खूप छान आहे। आता तिला कॅनव्हास आणून देते. सांड किती सांडायच, मग मॉर्नींग, इलूजन, डिप सी, असले शब्द वापरून एक माहिती लिहायची, झाल ऍबस्ट्रॅक्ट आर्ट तयार. म्हंटलं एवढं समजाउन सांगूनसूद्धा कळत नाही म्हणजे माझा प्रोब्लेम असेल असं मला वाटलं. मग मी दोघातिघांना विचारलं, तर त्यांनी मलाच वेड्यात काढलं. अगं तो किती ग्रेट पेंटर आहे. त्याची चित्र अशीच असतात, डिप मिनींगवाली. मला वाटलं आत्ता ते चित्र फाडून बघावं म्हणजे कळेल डीप विदिन काही आहे का ? म्हणजे एकंदरीत कोणालाच कळाल नव्हतं चित्र कसलं आहे ते!!


अरे मग सांगा ना नाही कळालं त्यात लाजायच काय ? अशामुळेच फावत या लोकांचं. कळलं नाही म्हणून स्वत:च हसं करून घेण्यापेक्षा ग्रेट ग्रेट म्हणून न कळणाऱ्यांच्या कळपात अलगद सामील व्हायच. म्हणजे सगळ्यांना माहित असतं, कळल नाहिये पण ते मान्य करायच नाही असा अलिखित नियम असावा.
मग मी खूप शोध घेतला।

एकाने नुसता एक काळा चौकोन काढला होता !!!! अरे काय ? काढा काय हवा तो अर्थ. नाव होतं "ब्लॅक". अरे मला रंग ओळखता येतात. एकाचा नुसता त्रिकोण. मग त्यावर चर्चा चालली होती. इजिप्तच्या पिरॅमिडपासून, डोंगर. उंची दाखवणारं चित्र, वगैरे काहीही. मला फक्त भूमिती आठवली. म्हणजे थोडक्यात फारसा काही स्पष्ट अर्थ नसलेली चित्र. तुम्ही काढाल तो तुमचा अर्थ.


ह्या सगळ्यातून मला अस कळाल, ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की डोंगर, नद्या, किंवा व्यक्तीचित्र लावलं की एका आठवड्याने त्याचा कंटाळा येतो। कारण एकदा-दोनदा बघितलं की ते कळतं (हे महत्वाचं) आणि मग कळलं की रोज तेच बघायचा कंटाळा येतो ( जसा नवऱ्यांना तीच बायको बघायला येतो कितीही सुंदर असली तरी ) तर ऍबस्ट्रॅक्ट आर्ट हे अस चित्र की रोज थांबून जे तुम्हाला बघावसं वाटतं. ते काय आहे हे समजून घ्यावसं वाटतं (समजण्यासारखं काही नसलं तरीही). असा माझा निष्कर्ष, बघा पटतयं का ?


दीपा मिट्टीमनी

Wednesday, September 17, 2008

पछाडलेली

" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, पण मन कान भरेनाच, मग हजारदा ऐकलं। मला त्या गाण्यानं पछाडलच. मग कॅसेटवर ए साइडला शेवटी आणि बी साइडला पहिलं टेप केल. त्यावेळी सीडी, रिपीट असे ऑप्शन नव्हते. अलट पलट चालू राहिलं. सगळे वैतागले ते गाणं ऎकून, पण मला वैतागच येईना, अजूनही येत नाही,


हे अस झपाटलंपण किंवा एखाद्या गोष्टीन पछाडणं फार महत्वाचं असतं आयुष्यात. रोजच्या जगण्याल उर्जेचा स्त्रोत देत राहतात या गोष्टी. हे वेडंच माणसाला शहाण्यासारखं जगायला शिकवतं.
मला आठवत अगदी लहानपणी आम्ही काड्यापेटीचे छाप गोळा करायचो। त्या छंदाने इतकं झपाटलं होतं की रस्त्यावरून चालताना मी खाली बघून शोधतच चालायचे। पार कचऱ्यातले, चिखलात माखलेले छाप गोळा करायचे। कुठे बाहेरगावी फिरायला गेलो, की साइट सीईंगपेक्षा माझ लक्ष रस्त्यावरच्या कचऱ्यावरच। मग ते खूळ संपल। आईलाच हुश्श झाल।


मग कधीतरी उर्दुचं वेड लागलं. डिक्शनरी घेऊन बसायचं, शब्द शोधायचे, अर्थ लावायचे, त्याचा वापर करून बघायचा. मग डोक्यात रात्रंदिवस तेच.
" मेरा कुछ सामान " गाण्यावरून इजाजतपर्यंत पोचले। मग इजाजतमधल्या मायाने पछाडलं. उगाच विचारत राहिले कोण बरोबर कोण चूक. रेखाचंही बरोबर. मायाचंही. चूक कोणाची ? नियती ? आयुष्य ? खूप सारे प्रश्न आणि हे सारे मी वाहत राहिले माझ्याबरोबर. खूप त्रास होतो कधी कधी, अस वेड घेऊन जगण्याचा. कधी कधी ते भूत इतकं मानगुटीवर बसतं की रोजचं जगणं, रोजची कामं अशक्य होऊन बसतात. खोटं सांगत नाहीये.


अबिदा परवीनचं " मन लागो यार फकिरीमें " - संत कबीर हे गाण ऎकलं. नेहमीप्रमाणेच अनेकवेळा, आणि जणू मला विरक्तीच आली. " तू क्यू फिरता मगरूरीमें .......... मन लागो यार फकिरीमें " इतका परिणाम होतो ना माझ्यावर छोट्या छोट्या गोष्टींचा, दिसायला छोट्या पण माझं अस्तित्व व्यापणाऱ्या.
रोज उठून तेच कंटाळवाणं आयुष्य जगताना हे अस पछाडलेपण असलं की आयूष्य कंटाळवाणं राहातच नाही.

दीपा मिट्टीमनी

य़ंत्र

रोजचा पेपर आला। चहा घेता घेता वाचला. आता तुम्ही म्हणाल मग त्यात विशेष काय ? सगळ्यांकडेच येतो रोज. सगळेच वाचतात.

पण आजची बातमीच जरा वेगळी होती। एका माणसाने कहीतरी शोध लावून एक यंत्रमानव बनवलाय, असा की ज्याला भावना आहेत. म्हणजे काही ठराविक गोष्टींमध्ये तो भावनिक चर्चा ही करू शकतो. कसली गंमत ना ? म्हणजे आज गप्पा मारायाला कुणी नाही, म्हणजे अगदी चॅटवरही कुणी नाही तर हा तुमच्याशी बोलेल. बुद्धीबळ खेळायला कुणी नाही, हा तुमच्याशी तुमच्यासमोर बसून खेळेल, तेही भावना ओतून. म्हणजे तुमच्या चालीने त्याचा घोडा मरणार असेल तर त्याला वाईट वाटेल. तसे गेम्स असतातच की कम्पुटरवर, प्रोग्राम केलेले, हजारोवेळा बुद्धीबळ खेळलो असेल. पण तिथे जिंकलो ना तरी जिंकल्याची मजा नाही, कारण समोरच्याला हरल्याच दु:खच नसत. तर अस यंत्र ज्याच्याशी तुम्ही खेळू शकता, आणि ज्याला हरल्याच दु:खही होतं, काय मजा येईल !

नाहीतर कोणाला हल्ली वेळ आहे समोर बसून खेळायला किंवा बोलायला.
तंत्रज्ञान जसं जसं प्रगत होत गेल तसं तसं माणूसपण मागासलेलं होत गेलं। आंतरजालामुळे जग जवळ आल खरं पण माणसं दूर झाली. एक काचेची भिंत निर्माण झाली माणसा माणसांत. जी पारदर्शक तर आहे, माणूस माणसाला दिसतो, हात हलवून हसतो, पण गळाभेटीची सोय नाही. सायकलवर एक पाय ठेऊन दारात मैत्रिणीशी गप्पा मारण्यात जी मजा आहे ती चॅटवर निश्चितच नाही. ती कुजबुज, डोळ्यातील मिश्किल भाव, हात पुढे केल्यावर आपसूक मिळणरी टाळी, या भावना त्या यंत्राने कढून घेतल्या. संवादाची साधनं बरीच आहेय, पण ज्याच्याशी संवाद साधावा असं जिव्हाळ्याचं माणूसच नाही.

बघा भरकवटवलंत ना मला ! तर मी काय सांगत होते, अस भावना असलेला यंत्रमानव बनवलाय अशी बतमी आहे पेपरला बाकी साऱ्या त्याच बातम्या कूठे खून झाला, हुंड्यासठी आत्महत्या (जाळण्याचं दुसर नाव), १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सगळ्या, त्याच त्याच बातम्या. काही फ़रकच पडेनासा झालाय, मनावर ओरखेच उठत नाहीत. इतक दगडी झालंय का मन ? का मन नावाचा अवयवच उत्क्रांतीत गायब झालाय, माकडाच शेपूट गेलं तसं ?

" माणसाचं यंत्र झालंय" ही बातमी पण द्यायला हवी ना छापायला।


दीपा मिट्टीमनी