Wednesday, September 17, 2008

पछाडलेली

" मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है" एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, पण मन कान भरेनाच, मग हजारदा ऐकलं। मला त्या गाण्यानं पछाडलच. मग कॅसेटवर ए साइडला शेवटी आणि बी साइडला पहिलं टेप केल. त्यावेळी सीडी, रिपीट असे ऑप्शन नव्हते. अलट पलट चालू राहिलं. सगळे वैतागले ते गाणं ऎकून, पण मला वैतागच येईना, अजूनही येत नाही,


हे अस झपाटलंपण किंवा एखाद्या गोष्टीन पछाडणं फार महत्वाचं असतं आयुष्यात. रोजच्या जगण्याल उर्जेचा स्त्रोत देत राहतात या गोष्टी. हे वेडंच माणसाला शहाण्यासारखं जगायला शिकवतं.
मला आठवत अगदी लहानपणी आम्ही काड्यापेटीचे छाप गोळा करायचो। त्या छंदाने इतकं झपाटलं होतं की रस्त्यावरून चालताना मी खाली बघून शोधतच चालायचे। पार कचऱ्यातले, चिखलात माखलेले छाप गोळा करायचे। कुठे बाहेरगावी फिरायला गेलो, की साइट सीईंगपेक्षा माझ लक्ष रस्त्यावरच्या कचऱ्यावरच। मग ते खूळ संपल। आईलाच हुश्श झाल।


मग कधीतरी उर्दुचं वेड लागलं. डिक्शनरी घेऊन बसायचं, शब्द शोधायचे, अर्थ लावायचे, त्याचा वापर करून बघायचा. मग डोक्यात रात्रंदिवस तेच.
" मेरा कुछ सामान " गाण्यावरून इजाजतपर्यंत पोचले। मग इजाजतमधल्या मायाने पछाडलं. उगाच विचारत राहिले कोण बरोबर कोण चूक. रेखाचंही बरोबर. मायाचंही. चूक कोणाची ? नियती ? आयुष्य ? खूप सारे प्रश्न आणि हे सारे मी वाहत राहिले माझ्याबरोबर. खूप त्रास होतो कधी कधी, अस वेड घेऊन जगण्याचा. कधी कधी ते भूत इतकं मानगुटीवर बसतं की रोजचं जगणं, रोजची कामं अशक्य होऊन बसतात. खोटं सांगत नाहीये.


अबिदा परवीनचं " मन लागो यार फकिरीमें " - संत कबीर हे गाण ऎकलं. नेहमीप्रमाणेच अनेकवेळा, आणि जणू मला विरक्तीच आली. " तू क्यू फिरता मगरूरीमें .......... मन लागो यार फकिरीमें " इतका परिणाम होतो ना माझ्यावर छोट्या छोट्या गोष्टींचा, दिसायला छोट्या पण माझं अस्तित्व व्यापणाऱ्या.
रोज उठून तेच कंटाळवाणं आयुष्य जगताना हे अस पछाडलेपण असलं की आयूष्य कंटाळवाणं राहातच नाही.

दीपा मिट्टीमनी

No comments: